देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला, तर प्रश्नांपासून पळ काढण्यासाठीच सरकारचा हा प्रयत्न असेल हे त्यातून स्पष्ट होईल’, असे फडणवीस म्हणाले.
या वेळी फडणवीसांनी राज्यातील वीज बिलांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. ‘लोकसभेचे अधिवेशन कोरोनाच्या काळात व्यवस्थित चालते. आपले व त्यांचे अधिवेशन एकाच वेळी आहे. अधिवेशनातून लोकांचे प्रश्न मांडले जात असतात. राज्यात वीज बिलांच्या बाबतीत मोठी समस्या आहेत. 75 लाख लोकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज कनेक्शन कापलेले कधीही पाहिलेले नाही. सभागृहच घेतले नाही, तर हे मांडायचे कुठे? त्यामुळे पूर्ण चार आठवड्यांचे अधिवेशन घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
‘नो वन किल्ड जेसिका’सारखी परिस्थिती
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा फडणवीस यांनी या वेळी पुनरुच्चार केला. ‘राज्य सरकार राठोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारचा पोलिसांवर पूर्ण दबाव आहे. या प्रकरणात समोर आलेले पुरावे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळत नाहीत. पोलिसांकडे आयतेच पुरावे आहेत, पण कारवाई शून्य आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली काहीच करीत नाहीयेत. इथे नो वन किल्ड जेसिका सिनेमासारखी परिस्थिती दिसते आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
‘आपल्याच आमदारांना घाबरणारे हे पहिलेच सरकार’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचे दिसतेय. प्रचंड बहुमत असताना आपल्याच आमदारांना इतके घाबरणारे सरकार मी पहिल्यांदाच पाहातो आहे’, असे फडणवीस म्हणाले.
‘हे घाबरट सरकार आहे. नियमावलीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते, पण गेल्या काही दिवसांमधील चर्चा पाहिल्या, तर हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचे दिसते. आपला उमेदवार पडतोय की काय याचीच सरकारला जास्त भीती आहे, पण चांगले आहे. यामुळे आमचे मनोरंजन आणि आमदारांचे भले होतेय’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
‘तो’ पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिनेमाचे शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशार्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. ‘नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितेय की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचेच भले आहे. नवे नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचे नाव कमवायचे आहे. त्यामुळे त्यांना वाटते की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते? इथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात’, असे फडणवीस म्हणाले.