मुंबई : प्रतिनिधी
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी ’आयएनएस करंज’ बुधवारी (दि. 10) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईत समारंभपूर्वक या पाणबुडीचे जलावतारण झाले. या पाणबुडीमुळे भारतीय नौसेनेची ताकद कैकपटीने वाढणार आहे. शत्रुला थांगपत्ता लागू न देता त्यांच्या प्रदेशात पोहोचून विध्वंस घडवण्याची क्षमता ‘आयएनएस करंज’मध्ये आहे. 1565 टन वजनाची ही पाणबुडी 70 मीटर लांब व 12 मीटर उंच आहे. ती क्षेपणास्त्राने सज्ज असून, समुद्रात सुरूंग पेरण्यासही सक्षम आहे. रडारला चकवून हल्ला करण्याची क्षमता हे ’करंज’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.
चीन, पाकला शह : ’आयएनएस करंज’मुळे हिंदी महासागरातील भारताची ताकद वाढणार आहे. या समुद्री क्षेत्रात भारतासमोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान आहे. चीन सतत आपल्या समुद्रीशक्तीचा विस्तार करीत आहे. आता नव्या पाणबुडीमुळे चीनसह पाकिस्तानवर भारताला वचक ठेवता येईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper