मुंबई ः प्रतिनिधी
देशातील कोरोना संकटामुळे बीसीसीआयने 10 मिनिटांच्या बैठकीत 14वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचे थैमान पाहून घाबरलेले परदेशी खेळाडू आता घरी कसे जायचे, असा सवाल करू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणार्या थेट विमानसेवांवर बंदी घातल्याने परदेशी खेळाडूंची चिंता वाढली. अशा वेळी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने एक आदर्श घालून दिलाय. तो केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही संघातील खेळाडूंमागे खंबीरपणे उभा राहिलेला पाहायला मिळतोय.
महेंद्रसिंह धोनीने आपल्या संघातील खेळाडूंना वचन दिले की, जोपर्यंत संघातील शेवटचा व्यक्ती घरी परतण्यासाठी विमानात बसत नाही, तोपर्यंत तो स्वतः रांचीत परतणार नाही. धोनीने सांगितले की, हॉटेलमधून बाहेर पडणारा तो अखेरचा व्यक्ती असेल. परदेशी खेळाडूंनी प्रथम मायदेशासाठी रवाना व्हावे. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जावे, असा माहीचा आग्रह होता. सर्व खेळाडू आपापल्या घरी सुखरूप पोहचल्यानंतर माही रांचीला रवाना होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper