ग्रामपंचायतीने बसविला नवीन पंप
पाली : रामप्रहर वृत्त
पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्यामुळे जांभूळपाडा (ता. सुधागड) ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले होते, परंतु ग्रामपंचायतीने नवीन पंप बसविल्यानंतर शुक्रवारी (दि. 28) येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीचे पाणी एका मोटार पंपाने उचलून जॅकवेलमध्ये आणले जाते. नंतर ते जलकुंभामध्ये साठवून गावाला पाणीपुरवठा केला जातो. तौक्ते चक्रीवादळात या पाणीपुरवठा योजनेतील पंप जळाला होता. त्यानंतर तिथे दुसरा मोटार पंप बसविण्यात आला. मात्र तोही बिघडला. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून जांभूळपाडा गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती.
ग्रामपंचायतीने गुरुवारी सायंकाळी नवीन पंप बसविल्यानंतर शुक्रवारी जांभूळपाडातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती सरपंच श्रद्धा कानडे यांनी दिली.