अलिबाग ः रामप्रहर वृत्त
भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समूहाने कोविडच्या संकटावर मात करण्यात सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत अलिबाग तालुक्यातील नवेदार नवगाव गावात लसीकरण मोहीम राबविली. यामध्ये तब्बल 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला. रायगड जिल्ह्यात विशेषत: अलिबाग भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेत कंपनीने ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टशी करार करून नवेदार नवगाव गावात सुमारे 500 नागरिकांना लस देण्याची व्यवस्था केली. या उपक्रमामुळे येथील बहुतांश ग्रामस्थांना कोविड लसीचा पहिला डोस मिळू शकला. वेदांत समूहाचे उपाध्यक्ष नवीन अग्रवाल यांचे पुत्र आणि ‘रुनाया’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनन्य अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाविषयी बोलताना अनन्य अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या संकटात ‘रुनाया’तर्फे हे समाजहिताचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात या भागात कोविडच्या रुग्णांत वाढ झाल्याने आम्ही येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आनंद आहे. पुढील काही दिवसांत आम्ही समाजहितासाठी अशा आणखी लसीकरण शिबिरांचे आयोजन करणार आहोत. सोमवारच्या लसीकरण मोहिमेत नवेदार नवगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शेखर बाली आणि प्रशासकीय अधिकारी प्रार्थना भोईर उपस्थित होते. या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रार्थना भोईर यांनी सांगितले की, प्रत्येकाला वेळेत लस दिल्याने कोविडविरुद्धच्या लढ्यात विजय मिळविण्याची संधी आहे. या मोहिमेतून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे एक कृतिशील पाऊल उचलले गेले. त्याबद्दल आम्ही अनन्य आणि रुनाया समूहाचे आभारी आहोत.