अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध घेऊन उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला त्यांचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक गर्दी करतात. सकाळच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील 11 जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper