नवी मुंबई : प्रतिनिधी
शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या निर्बंधांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी कडक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईत दिवसा जमाबंदी असतांना, अनधिकृतपणे सुरू असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसायामुळे, बाजारात गर्दी दिसत आहेतर बरेच जन विनामास्क फिरताना नजरेस पडत आहेत, असे असताना मनपाचे भरारी पथक बेफिकीर नागरिकांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरात अल्पावधीतच कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांची संख्या पार केली होती. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरात कडक निर्बध लागु केले. आयुक्तांनी जाहीर केलेल्या निर्बंधाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेचे विभाग अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांच्याकडून कठोर अंमलबजावणी होत नसल्याने, एपीएमसी मार्केट, आठवडे बाजार, शहरातील रस्त्यावर, रेल्वे स्थानक पूल आदी ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय करणारे फेरीवाले यामुळे नागरिक बाजारात सर्रास फिरतांना दिसुन येतात. यामुळे विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदी अश्या नियमांचे उल्लंघन होत आहे. नवी मुंबई मनपाकडुन, लसीकरण सुरू असताना, दुसरीकडे निर्बंधाची पायमल्ली होत आहे. कोरोनाच्या संख्येत घट होत आहे. ही जमेची बाजू असली तरी मनपाच्या अतिक्रमण विभागाने बोटचेपी धोरण स्वीकारले असल्याने, अनधिकृत बांधकामे व फेरीवाले वाढल्याचे दिसुन येते कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी व यंत्रणा यांना कामाला लावावे, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबई मनपाच्या आठ विभाग अधिकार्यांच्या अधिपत्याखाली भरारी पथक नेमण्यात आलेले आहे. आम्ही वेळोवेळी कारवाई करीत असतो.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त (प्रशासन), नवी मुंबई महापालिका