अलिबाग : प्रतिनिधी
आपल्या विविध प्रलंबीत मांगण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचार्यांनी बुधवारपासून (दि. 22) दोन दिवस संप पुकारला आहे. त्याला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे 15 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे न शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट झाला होता.
विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून शेकडो कर्मचारी बुधवारी (दि. 23) अलिबाग येथील संघटना सदन येथे एकत्रित जमले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा त्यांचा बेत होता, परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे संघटना सदन कार्यालयासमोरच सरकारी धोरणांविरोधात जोरदार निदर्शने केली. संपामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शांतता होती. संपाची पूर्वकल्पना नसलेल्या व कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरीकांना मात्र काम न होताच परत जावे लागले.
संपकरी कर्मचार्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सादर केले. या वेळी समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, शिक्षक समिती सरचिटणीस अनिल नागोठकर, शिक्षक भारतीचे दीपक पाटील, महसूल संघटना अध्यक्ष राकेश सावंत, सरचिटणीस संतोष तावडे, वन कर्मचारी संघटनेचे पालकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अरुण भांदूर्गे, सरचिटणीस विकास पवार, आरोग्य कर्मचारी संघटनेचे धिरेंद्र पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
- जुनी पेन्शन योजना लागू करा
- किमान वेतन देवून कंत्राटी व योजना कर्मचारयांना कायम करा
- बक्षी समितीचा अहवाल जाहीर करा
- निवृत्तीचे वय 60 वर्षे करा
- रिक्त पदे तातडीने भरा
- केंद्राप्रमाणे भत्ते द्या
RamPrahar – The Panvel Daily Paper