Breaking News

विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या  शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ -माधव भंडारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सुतोवाच मंगळवारी (दि. 17) पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीची भाषा केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून शोधा आणि फोडा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले गेले आणि हे उघड्या डोळ्यांनी दिसतानाही महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या मूक संमतीनेच आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला आहे की काय, असा सवाल माधव भंडारी यांनी उपस्थित केला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणार्‍या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच मिळाल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस व दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. (पान 5 वर)

भाजप नेते माधव भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हटले की, आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधार्‍यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पोलीस यंत्रणेला वेठीस धरून सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटील डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादीकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता दहशतवादास सामोरे जाणार्‍यांवरच कारवाई केली जात असल्याने सत्ताधार्‍यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते. केतकी चितळे प्रकरणानंतर जाहीर पत्रक काढून मारहाण करण्याच्या, तोडण्याचा आदेश दिला जात असताना पोलिसांनी व सरकारने पाळलेले मौन म्हणजे या कटाचाच पुरावा आहे, असेही भंडारी यांनी अधोरेखित केले.

शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे, पण कायदेशीर कारवाई सुरू असताना मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो, असे भंडारी म्हणाले. 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.

खैरनार यांच्यासारख्या अधिकार्‍याने प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम उघडूनही विचलित न होता शांत राहणार्‍या पवार यांच्यावर एका अभिनेत्रीने केलेल्या टीकेमुळे राज्याची कायदा सुव्यवस्था वेठीस धरण्याच्या हालचाली याच वैफल्यातून सुरू आहेत, असे सांगून पोलिसांना हाताशी धरून त्याची योजनाबद्ध कार्यवाही सुरू असल्याचा संशयही माधव भंडारी यांनी व्यक्त केला. कायद्याचे संरक्षण प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे, मात्र त्या पलीकडे जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर तुटून पडा, असे आदेश हिंसकवादी भूमिका जाहीर करीत आहेत, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply