कर्जत ः शेतकरी कामगार पक्षात पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत, मात्र या नियुक्त्या करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे शेकापमधील गटबाजी व नाराजी उघड झाली आहे. नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चेअंती उमरोली गटातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठवून दिले आहेत. राजीनामे देणार्यांमध्ये नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र विरले, तालुका उपचिटणीस मारुती विरले, पुरोगामी युवक संघटनेचे मावळते अध्यक्ष वैभव भगत तसेच जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विष्णू कालेकर, रामदास शेलार, दशरथ शेंडे, सुहास भगत, विद्यार्थी संघटनेचे सुशील कालेकर, परेश कोळंबे, माजी उपसरपंच रामदास हजारे, उपसरपंच सदानंद थोरवे तसेच नितेश भगत, राजेश नाईक, सुरज भगत, निलेश ठोंबरे यांचा समावेश आहे. राजीनामापत्राच्या प्रती कार्यकर्त्यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील तसेच आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, पंडित पाटील यांना पाठविल्या आहेत. त्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे.
Check Also
हंगामा हो गया…बिंदू ८५ वर्षांची झाली
सत्तरच्या दशकात मी शाळेत असतानाचा विनोद ( आता त्यावर हसता येणार नाही. वेगळ्या अर्थाने हसाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper