Breaking News

खेरणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

शेकापची 25 वर्षांची सत्ता उलथवली; शैलेश माळी थेट सरपंचपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शेकापला पराभवाची धूळ चारली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत.
पनवेल तालुक्यातील झालेल्या एकमेव खेरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 17) जाहीर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी शेकापची सत्ता राहिली होती. शेकापने सत्तेचा वापर नेहमीच स्वार्थासाठी केला हे तेथील जनतेला कळून चुकले. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी भाजपला कौल दिला. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विजयी झाले असून सदस्यपदी रूपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, सुभद्रा संतू माळी, अक्षता सचिन पाटील निवडून आले आहेत. या सर्वांचे तसेच कार्यकर्त्यांचे भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत व इतर पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले. या वेळी तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी जि. प. सदस्य एकनाथ देशेकर, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, बुधाजी माळी, महेश पाटील, प्रकाश खैरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खेरणे ग्रामपंचायतीमधील हा विजय भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षे शेकापने राज्य केले. अखेर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
-शैलेश माळी, नवनिर्वाचित सरपंच, खेरणे ग्रामपंचायत

अलिबागेतही शेकापला पराभवाचा धक्का
अलिबाग : तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीने शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये शेकापचे थेट  सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे, तर नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना पुन्हा एकदा मात दिली आहे. विजयानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कर्जत ग्रामीणमध्ये ‘कमळ’ उमलले
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर झालेल्या विविध पक्षांच्या आघाडीने विजय मिळविला असून पाली खलाटी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीची बिनविरोध सत्ता आली आहे. पोटल ग्रामपंचायतीमधील आंबोट गावातून वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आघाडीतून निवडून आल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply