पनवेल : बातमीदार
पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात हॉटेल, ढाबे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपला ढाबा, हॉटेल रात्रीच्या वेळी दिमाखदार दिसावे व लांबूनच गिर्हाईकाना ते दिसावे यासाठी झाडांना वेगवेगळ्या रंगाची विद्युत रोषणाई करत आहेत, मात्र ही विद्युत रोषणाई झाडांसाठी बाधक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात असलेले पनवेल शहर व ग्रामीण भागाला सध्या सिमेंटच्या जंगलांनी वेढा घातला आहे. त्यामुळे आजूबाजूला इमारतीच इमारती उभ्या राहत आहेत. ठिकठिकाणी हॉटेल, ढाबे उभे राहत आहेत. त्यातच झाडांची संख्या देखील कमी होत चालली आहे. इमारतींसाठी झाडांची कत्तल केली जात आहे. त्यात आणखी भर पडली आहे. ती म्हणजे झाडांना विद्युत रोषणाई करण्याची. त्यामुळे झाडांना इजा पोहोचली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात मोठाले वृक्ष मरत असताना रोषणाईच्या उष्म्यात झाडांची श्वसनक्रिया मंदावण्याचा धोका निर्माण होत आहे. हे थांबवले नाही, तर भविष्यात मोठ्या प्रमाणात याचे दुष्परिणाम पाहावयास मिळू शकतात. त्यामुळे हे वेळीच थांबवणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई पाहावयास चांगली दिसत असली, तरी देखील ती झाडांसाठी धोकादायक आहे. रोषणाईच्या उष्णतेमुळे झाडांची निद्रा हरवत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारे विद्युत रोषणाई करणार्याविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper