Breaking News

अलिबागजवळ मच्छीमार नौकेला जलसमाधी

तिघे बचावले, एक जण बेपत्ता

अलिबाग ः प्रतिनिधी

समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली एक नौका गुरुवारी (दि. 12) पहाटे चारच्या सुमारास अलिबागजवळ समुद्रात बुडाली. या नौकेतील तीन जण बचावले, मात्र जब्बार निषाद हा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. अलिबाग कोळीवाडा येथील रणजित खमिस यांची अन्नपूर्णा लक्ष्मी ही नौका बुधवारी सकाळी 10 वाजता मच्छीमारीसाठी अलिबाग कोळीवाड्यातून  निघाली होती. आशिष निषाद (तांडेल) राहुल निषाद, जब्बार निषाद आणि राम सजिवन निषाद असे चार जण बोटीत होते. ते कोर्लई भागात मच्छीमारी करीत असताना पहाटे 4च्या सुमारास अचानक नौकेत पाणी घुसल्याने ती बुडू लागली. नौका बुडत असल्याचे पाहून तांडेल आणि खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या. सोबत असलेल्या इतर नौकांमधील खलाशांनी आपल्याजवळील जीवसुरक्षा साहित्य टाकून आशिष निषाद (तांडेल) राहुल निषाद आणि राम सजिवन निषाद या तीन जणांना वाचवले जब्बार निषाद यालाही वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र काळोख व दाट धुक्यामुळे त्याला वाचवता आले नाही. सूर्योदयानंतरही स्थानिक मच्छीमारांनी जब्बारला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही, तर पाणी शिरल्यामुळे अन्नपूर्णा बोट पूर्णपणे समुद्रात बुडाली. दरम्यान, या बोट दुर्घटनेबाबत अलिबाग मच्छीमार सोसायटी पदाधिकारी यांच्यासह मालक रणजित खमीस यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply