Breaking News

रसायनी स्टेशन सुविधांच्या प्रतीक्षेत

 

मोहोपाडा : प्रतिनिधी
पाताळगंगा रसायनी हे औद्योगिक क्षेत्र असून याठिकाणी असणारे रसायनी हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु गेले दोन वर्षांपासून येथील तिकीट घर गायब झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच अन्य सुविधांचीही वानवा असल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
रसायनी परिसर हा औद्योगिक क्षेत्राने नटलेला असून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, बॉम्बे डाईंग, अल्कली याशिवाय अतिरिक्त एमआयडीसी झोनमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत तसेच बीपीसीएल, इस्त्रो यासारख्या सरकारी प्रोजेक्ट येथे कार्यरत आहेत. महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लईसारखे शैक्षणिक संस्था, सेबी केंद्र याठिकाणी असून मुख्य रेल्वे स्टेशन असणारे रसायनी रेल्वे स्टेशनमध्ये विविध कमतरता जाणवताना दिसत आहेत. शिवाय येथील तिकीट दर कोरोनानंतर जे बंद करण्यात आले ते अद्याप बंदच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणार्‍या नागरिकांची व विद्यार्थ्यांनची त्रेधा उडत असून त्यांना तिकीट काढण्यासाठी तीन किमी रिक्षाने प्रवास करावा लागत असून वेळ व अतिरिक्त भारही सोसावा लागत आहे.
रसायनी रेल्वे स्टेशनला गेले कित्येक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. या ठिकाणी कोकणात जाणार्‍या गाड्यांची रेलचेल चालू असते. रेल्वे प्रवाशांना निवारा शेड तसेच बसण्यासाठी बाकडे नाहीत. पिण्याच्या पाणीची सुविधा नाही. तसेच महिला वर्गासाठी प्रसाधनगृह सुद्धा उपलब्ध नाही. स्थानकाच्या आसपासच्या परिसरात गवत वाढलेले असते. प्रवाशांना पावसात तर उन्हाळ्यात भर उन्हात स्थानकावर रेल्वेची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून खंत व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकाच्या बाजूला कष्टकरीनगर, ठाकूरवाडी, जुनी पोसरी अशी गावे आहेत. या गावाला रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत आहे. या ठिकाणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेने याठिकाणी वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधला होता, परंतु या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तोही सध्या बंद स्थितीत आहे. एकंदरीत रसायनी रेल्वे स्थानकाला कोणतीही सुविधा नसल्याने नागरिक व प्रवासी वर्गाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी तुराडे ग्रामपंचायतीकडून होत आहे.

रेल्वे प्रवाशांकडून कार्यवाहीची मागणी
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक क्षेत्र असून येथे बाहेरील कामगारवर्ग मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करत आहे. शिवाय रसायनी परिसरातील इंजिनिअरींग कॉले, नामांकित शिक्षण संस्था असल्याने दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रसायनीत येतात. या वेळी या रेल्वे स्टेशनवर विविध समस्या असल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply