Breaking News

महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध-प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

पेण : प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 16) पेण येथे केले.
भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्व. सुषमा स्वराज गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पेणमध्ये माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्या वेळी भाजप नेत्या चित्रा वाघ बोलत होत्या.
या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री अ‍ॅड. माधवी नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, माजी जि.प. अध्यक्ष नीलिमा पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, पालीच्या माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा, प्रज्ञा ढवण, डॉ. मंजुषा कुंद्रीमोती, जान्हवी पारेख, नीलिमा भोसले, वैशाली मपारा, श्रेया कुंटे यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याचीही अंमलबजावणी होताना दिसत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही महिलाविषयक योजना प्रभावीपणे
राबवित आहे. महिलांसाठी लेक लाडकी नावाची एक योजना नवीन स्वरूपामध्ये राज्य सरकारने आणली आहे. एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ असे अनेक निर्णय घेण्यात आले. महिला बचत गटांच्या मालाला बाजारपेठ मिळावी याकरिता मुंबईमध्ये युनिटी मॉलची स्थापना सरकार करीत आहेत.
आज ज्यांच्या नावाने उपस्थित महिलांना पुरस्कार दिला जात आहे त्या स्व. सुषमा स्वराज यांचे सामाजिक, राजकीय जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनातही मोलाचे योगदान आहे. आपल्या मंत्रिपदाच्या काळात अनेक महिलांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी केले. सामाजिक जीवनात काम करीत असताना अशा पद्धतीचे काम करा की, माझ्यासारख्या अजून मी 100 जणी तयार होतील, असा मौलिक सल्ला चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांना दिला.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात दुर्दैवाने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली होती. यातूनच भाजपचे सरकार असणे आणि नसणे हे जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाऊन तिथल्या महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम चित्रा वाघ यांनी केले असून आज त्यांच्या उपस्थितीमध्ये येथील रणरागिणींचा सत्कार होताना पाहून आनंद होत आहे. जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. अत्याचाराच्या विरोधामध्ये महिलांनी आवाज उठवावा आणि त्याची सुरुवात आजच्या सोहळ्याने निश्चितपणाने करू शकतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा रायगड जिल्हा महिला मोर्चाचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
अ‍ॅड. माधवी नाईक, प्रितम पाटील, नीलिमा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास जिल्ह्याभरातून महिलांची उपस्थिती होती.
विविध योजनांमधून बळ -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, 2014पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य प्रत्येकाला ज्ञात असून राजकारणातील किंवा राजकारणविरहित व्यक्तींच्या मनातसुद्धा त्याच्याविषयी आदर निर्माण झाला आहे. महिला सक्षमीकरणात ते अग्रेसर असून निश्चितपणाने येणार्‍या कालावधीत अधिकाधिक बळ महिलांना मिळत राहावे यासाठी केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार वेगवेगळ्या योजना राबवित आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply