Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाहणीनंतर प्रतिपादन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे; तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 7) केले. उलवे येथे प्रत्यक्ष विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर अदानी समुहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बरणे व श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, एमएआरडीएचे संचालक डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले होते आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले व वेगाने काम सुरु आहे यांचा आनंद आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2024पर्यंत हे विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न असेल. या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणार्‍या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असून मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 22 किलोमीटरचा सि-लिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारसाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.4 किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.
विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि 2024मध्ये प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशा सूचना या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केल्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply