अमेठी ः वृत्तसंस्था
अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने नाकारले आहे. या विजयाने भारावून गेलेल्या स्मृती इराणी यांनी अमेठीतील जनतेसाठी नवी पहाट उगवली आहे, अशी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.
विजयानंतर इराणी यांनी ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपला विजय म्हणजे अमेठीवासीयांसाठी एक नवी पहाट नवा संकल्प घेऊन उगवल्याचे स्मृती यांनी म्हटले आहे. अमेठीतील जनतेने विकासावर विश्वास दाखवत कमळ फुलवल्याचेही त्यांनी नमूद केले.
इराणी यांनी विजयाचे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. राहुल यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, एका बाजूला एक कुटुंब होते, तर दुसर्या बाजूला होती एक संघटना. ही संघटना अमेठीतील लोकांसाठी एखाद्या कुटुंबासारखेच काम करीत होती. या वेळी केरळ आणि बंगालमध्ये आपले प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper