पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आर्थिक प्रगतीचा आढावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत, असे पूर्वी म्हटले जायचे, मात्र देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचे चित्र बदलून टाकले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 23) केला. नवी दिल्लीत आयोजित ईटी ग्लोबल बिझनेस समीटमध्ये ते बोलत होते.
देशाने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी घेतला. ते म्हणाले, 2014 साली अनेक पातळ्यांवर व निकषांवर आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेल्याचे चित्र होते. मग ती महागाई असो, चालू खात्यातील तूट किंवा वित्तीय तूट. आर्थिक सुधारणा अशक्य आहेत असा एक समज झाला होता. भारतीय जनतेच्या सहकार्याने आम्ही तो समज खोडून काढला.
गेल्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक अंगांनी झेप घेतली आहे. यापूर्वी विकासाचा दर 5 टक्के; तर महागाईचा दर 10 टक्के होता, मात्र गेल्या काही वर्षांत महागाई दर 4.5 वर, तर विकासदर 7 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जीएसटीने जीडीपीच्या वाढीत मोलाची भूमिका बजावलीय. जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या पातळीवर प्रथमच इतके आश्वासक चित्र निर्माण झाले आहे, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला.