रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (दि. 24) पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर धुवाँधार पाऊस बरसायला सुरुवात झाली. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. रस्त्यावर फूटभर पाणी होते. त्यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती.
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली होती, पेण ते वडखळ या सहा किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल दोन ते अडीच तास जात होते.
अंबा, कुंडलिका नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. गेली आठ दिवस पाऊस नसल्याने शेतातील पाणी कमी झाले होते, परंतु आता जोरदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.