Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये हालचालींना वेग; 28 हजार सैनिक तैनात

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच खोर्‍यात सुरक्षा दलाच्या 280 कंपन्या (28 हजार जवान) तैनात करण्यात येत आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील तसेच खोर्‍यातील इतर ठिकाणांवर जवान तैनात केले जात आहे. या सुरक्षा दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेत सीमा पोलीस (आयटीबीपी) यांचा

समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशाप्रकारे अचानक 280 पेक्षा जास्त कंपन्या म्हणजेच (28 हजार जवान) रात्री उशिरापर्यंत तैनात करण्याचे कोणतेही कारण दिले नाही. शहरात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून त्यांनी आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, तर स्थानिक पोलिसांची उपस्थिती नाममात्र आहे.

याआधी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर दौर्‍यावरून परत येताच 10 हजार जवान तिथे पाठवण्याचा आदेश दिला होता. जेणेकरून बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची घडी बसवता येईल आणि दहशतवादविरोधी अभियान आणखी वेगाने करता येईल. देशातील विविध भागात तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांना एअरलिफ्ट करून थेट काश्मीरला पोहोचवले जात आहे. या कामासाठी हवाई दलाची मालवाहतूक विमानांचा वापर केला जात आहे. जम्मू-काश्मीरचे महासंचालक दिलबाग सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या 100 आणखी कंपन्या तैनात केल्या जात आहेत. प्रत्येक कंपनीत 100 जवान असतील. गृहमंत्रालयाने 25 जुलै रोजी सीआरपीएफच्या अतिरिक्त 100 कंपन्या तैनात करण्याचा आदेश दिला होता.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल गुपचूप काश्मीर खोर्‍यातून श्रीनगरमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत वेगवेगळी बैठक केली. यामध्ये राज्यपालांचे सल्लागार के. विजय कुमार, मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यन, पोलीस महासंचालक दिलबाग सिंह, पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त यांचा समावेश होता. काश्मीर दौर्‍यावर दिल्लीतून आयबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची टीमही डोभाल यांच्यासोबत होती.

काही धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. परदेशी दहशतवादी इथे तैनात पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुवारी सुरू झालेली उन्हाळ्याची सुटी पुढील 10 दिवस असेल. अमरनाथ यात्रेसाठी सुरू असलेले लंगरही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही राज्यपाल राजवट आहे. याआधी 24 फेब्रुवारीला देशभरातून केंद्रीय निमलष्कर दलाच्या 100 कंपन्या काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त व्यवस्था आवश्यक असल्याचे तेव्हा सांगितले होते, मात्र अमरनाथ यात्राच्या सुरक्षेसाठी अजूनही केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे 40 हजार अतिरिक्त जवान तैनात केलेले आहेत.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply