मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा केली.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा ध्वज हाती घेतला. आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे पाटील म्हणाले. भाजपशिवाय सध्याच्या काळात पर्याय नाही, असे सांगून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचे कौतुक केले.
भाजप कुटुंबाचा पक्ष नाही : फडणवीस
आमचा पक्ष एक कुटुंब आहे, हा कुटुंबाचा पक्ष नाही, असा टोला हाणतानाच गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट पाहत होतो. आज अखेर ते भाजपमध्ये आले. आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत साधारणपणे सरकारविरोधात जनमत असते, पण या निवडणुकीत प्रथमच जनमत सरकारच्या बाजूने होते, असेही ते म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी इंदापूरमधून पाटील यांची उमेदवारी जाहीर करतानाच इंदापूरचा निकाल आपल्या बाजूने शंभर टक्के लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
…तर बारामती जिंकली असती : चंद्रकांत पाटील
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये खूप उशिरा आले. ते जर लोकसभा निवडणुकीच्या वेळी आले असते, तर बारामती जिंकली असती. हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper