मुख्यमंत्र्यांचा विश्वास; सिंधुदुर्ग टँकरमुक्त करण्याची घोषणा
कणकवली : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येईल आणि आभार मानण्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत एकदा येईन. फक्त येथील लोकांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) येथे केले. ते महाजनादेश यात्रेदरम्यान बोलत होते.
या वेळी मंत्री विनोद तावडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, सुरजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, तसेच अजित गोगटे, नंदू घाटे, राजन म्हापसेकर, अन्नपूर्णा कोरगावकर, स्नेहा कुबल, मनोज नाईक, महेश सारंग आदी उपस्थित होते.
राज्य शिक्षणात आणि उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्हा पुढील तीन वर्षांत टँकरमुक्त करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
माझा भाजपप्रवेश नक्की : नारायण राणे
भाजप-शिवसेनेचे काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असे सांगत मुंबईतच भाजपमध्ये प्रवेश व्हावा, अशी इच्छा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्गात पोहचली. या यात्रेचे राणे यांनी स्वागत केले. त्या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुत्र आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.