मुंबई : प्रतिनिधी
यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. आयसीसीच्या नियमावलीमध्ये अशा कारणासाठी एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीच्या बैठकीत पाठिंबा मिळाला नाही.
14 फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची तयारी सुरू केली. दहशतवाद पसरवणार्या देशांना बहिष्कृत करण्यासंबंधीचं पत्र बीसीसीआयने आयसीसीला पाठवलं होतं. त्या पत्रात भारताचा रोख पाकिस्तानकडे होता.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघांत 16 जूनला वन डे विश्वचषकाचा साखळी सामना होणार आहे, मात्र अद्याप बीसीसीआयने या सामन्यात पाकशी खेळण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला संपूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाचं नुकसान होईल, असा इशारा अधिकार्यांनी दिला आहे.