कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील भालिवडी गाव हे गेल्या पंचवीस वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. येथील विद्यार्थी व ग्रामस्थ गेल्या 25 वर्षापासून या रस्यावरुन वर्षाच्या बाराही महिने खडतर प्रवास करीत आहेत. त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून, ग्रामस्थ मात्र कित्येक वर्षांपासून चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गौतम गोपाळ हजारे यांनी शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवरील ग्रामस्थांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि कर्जत तहसील कार्यालयालयाकडे पोस्टाने पाठविले आहे.
कर्जत शहरापासून भालिवडी गाव अवघ्या बारा-तेरा किलोमीटर अंतरावर असून, गावात दिडशेच्या आसपास कुटुंबे राहतात. शेती व शेतीपुरक जोडधंदे हा येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात सुशिक्षीत युवकांची संख्याही मोठी असून ते पुणे, ठाणे, मुंबई, नवीमुंबई परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जात-येत असतात. त्यांना आजही भालिवडी येथील खडतर रस्त्यावरुनच प्रवास करवा लागत आहे. कर्जतचे तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या काळात भालिवडी फाटा ते भालिवडी गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या रस्त्याकडे कुणीही लक्ष न दिल्याने या रस्त्याची पार दैनावस्था झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या भालिवडी ग्रामस्थांनी संबंधीतांना सह्यांचे निवेदन पाठविले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व नोकरदार येथील दुरवस्था झालेल्या रस्त्यावरुन प्रवास करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमच्या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाली असून, आम्हा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-गौतम हजारे, ग्रामस्थ, भालिवडी, ता. कर्जत
RamPrahar – The Panvel Daily Paper