Breaking News

विरोधकांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा

पेण पालिकेतर्फे विकासकामांचा प्रारंभ

पेण : प्रतिनिधी

विकासाला विरोध करून संघषर्र् करायचा व आपली पोळी भाजून घेणार्‍या विरोधकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे, चुकीच्या पद्धतीने काम करत राहणार्‍यांना आता संपविणे गरजेचे आहे. पेण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरू झाला असून, या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले. या ठिकाणी फक्त आंदोलनाची प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू असल्याने या मतदारसंघाचा विकास रखडला, अशी उपहासात्मक टीका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे बुधवारी (दि. 6) केली.

पेण नगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांंत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, सभापती सुहास पाटील, सभापती शहेनाज मुजावर, सभापती अश्विनी शहा, सभापती देवता साकोस्कर, सभापती नलिनी पवार, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, मुख्याधिकारी अर्चना दिवे, तहसीलदार अरुणा जाधव, लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, युवानेते ललित पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, कामगार सेल अध्यक्ष विनोद शहा, विस्तारक पंकज शहा, वंदना म्हात्रे, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी, अशोेक पाटील, तन्वी पाटील, कुणाल पाटील, हितेश पाटील, नगर परिषदेचे सर्व सदस्य, सदस्या, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.

शेकाप पक्ष हा कम्युनिस्ट विचारसरणीचा, पण त्यांनीही कामगारांचे हित काय असते याचा कधीही विचार केला नाही. ज्या कामगारांच्या पीएफचे कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या अकाऊंट नंबरमुळे खितपत पडले होते. त्या कामगार वर्गालाही दिलासा देण्याचे काम मोदी सरकारने केले असून आता एकच अकाऊंट नंबर सर्व ठिकाणी चालेल, अशी तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.

या वेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे खरोखरच अभिनंदन केले पाहिजे. पेणच्या जनतेसाठी त्यांनी अनेक सुखसुविधा केल्या. आज पेण विकासाच्या दिशेने झेपावत आहे

भात खरेदी केंद्रात आडवे पाय

भात खरेदी केंद्रासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. प्रत्येक वेळी आडवा पाय घालण्याचे प्रयत्न झाले, परंतु सहा संस्था रायगड जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या नेतृत्वाने सुरू केल्या व एक लाखापर्यंत भात खरेदी केली गेली ज्यांची भात खरेदी केंद्राची संस्थाने होती ज्यांनी नेहमीच शेतकर्‍यांना फसविण्याचे काम केले. त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या भात खरेदी केंद्राच्या संस्थेमुळे फटका बसला व भाजप सरकारने शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले.

ठेवीदारांचे पैसे मिळणार

पेण अर्बन बँक हा अतिशय महत्त्वाचा विषय असून यामध्ये सर्व सामाजिक घटकांना घेऊन आपली यंत्रणा पाठपुरावा करीत आहे, जे जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा मिळणारच आहे, परंतु ठेवीदारांचे पैसेदेखील देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

पेण तालुक्यातील खारेपाट पाण्याचा मोठा प्रश्न होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी देऊन पाण्याचा प्रश्नदेखील सोडविला आहे. 10 वषार्र्पूर्वी रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून पेण तालुक्यात विकासाची गंगा वाहत होती, परंतु आता हा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे रवीशेठ पाटील यांनी चांगला निर्णय घेतला. आता सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचे काम पेण तालुक्यात करणार आहोत व 2019च्या कालावधीसाठी युतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या वेळी जिल्हाप्रमुख किशोर जैन यांचेही भाषण झाले. आज पेण शहरात अनेक विकासकामांची उद्घाटने झाली व यापुढेही रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून, तसेच माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण शहराचा विकास आम्ही करणार आहोत, असा दावा नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केला.

ही आहेत विकासकामे…

या वेळी पेण नगर परिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतील विविध विकासकामे करणेंतर्गत मुक्ताई नगर येथील रस्त्याचे मजबुतीकरण, भूमिपूजन, शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पेण न. प.च्या नाट्यगृहाचे उर्वरित काम, चिंचपाडा गावठाण येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, भूमिपूजन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाह्यरस्ते विकास प्रकल्पांतर्गत पेण बाह्यवळण रस्ता, भूमिपूजन, 14व्या वित्त आयोगांतर्गत विश्वेश्वर क्षेपणभूमीवर भराव करून मैदान विकसित करणे, रोहिदास नगर येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेशद्वार उद्घाटन, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत स्टेडियममध्ये पॅव्हेलियन उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

येथील लोकप्रतिनिधींनी फक्त जनतेची दिशाभूल करून नारळ फोडण्याचे काम केले. आपला मतदारसंघ, गाव, तालुका याचा कसा विकास होईल याकडे लक्ष न देता फक्त आंदोलने करण्यात आपला वेळ घालविला. शेतकरी, कामगार या दीनदुबळ्या जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम युतीच्या माध्यमातून आमच्या सरकारने केले.
-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

शिवडी-न्हावा पेणला जोडले जाणार आहे. लवकरच मुंबईपासून अलिबागपर्यंत रेल्वे धावणार आहे. यामुळे पेणला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रो-रो सेवादेखील मांडवा जेटीला जोडली जाणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे पेण शहराच्या विकासाच्या द़ृष्टीने आपल्याला पाऊल टाकणे गरजेचे आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष, भाजप

जिल्हा नियोजन समितीचा  निधी पालकमंत्री यांच्याकडून मिळतो. हेही विरोधकांना माहिती नाही. आमच्या कामाचे श्रेय नारळ फोडून घेत आहेत, परंतु आमच्या कामाचे श्रेय आम्ही कोणालाही घेऊ देणार नाही व दुसर्‍याचे श्रेय घेणार नाही.
-प्रितम पाटील, नगराध्यक्षा

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply