प्रवासी, नागरिकांसाठी डोकेदुखी

खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहर रेल्वेस्टेशन रोड, दीपक चौक, बाजारपेठ, समाज मंदिर रोड येथे वाहतूक कोंडी कायमची समस्या बनली आहे.रेल्वे स्टेशन परिसराला तर प्रवासी वाहतूक रिक्षांचा विळखा पडला असून दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्याने येथून मार्ग काढण्यासाठी प्रवाशांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आला आहे. तसेच या स्टॅण्डवर एकावेळी 15 रिक्षा असाव्यात, असा नियम रिक्षा चालक-मालक संघटनेकडून घालून देण्यात आला आहे, मात्र अनेक रिक्षाचालक स्टॅण्डचा उपयोग न करता रस्त्यावर रिक्षा उभ्या करीत असल्याने समस्या वाढत आहे. त्यात क्षमतेहून अधिक रिक्षा लावल्या जात असल्याने अडचणीत भर पडत आहे. याबाबत रिक्षा चालक-मालक संघटना व पोलीस प्रशासन यांच्यात बैठका होऊन पोलीस अधिकार्यांकडून वाहतूक कोंडी व प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून काही सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. रिक्षाचालकांच्या मते खोपोली नगरपालिका व खोपोली पोलीस वाहतूक नियंत्रण केंद्राच्या परिसरात वाढीव जागेत रिक्षा स्टॅण्ड निर्माण व पर्यायी रस्ता केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. खोपोली रेल्वेस्टेशनमध्ये लोकल आल्यानंतर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, रिक्षाचालक व सामान्य प्रवाशांत होणारे टोकाचे वाद, त्यात रिक्षाचालकांची दादागिरी, त्यातून प्रवाशांची गळचेपी येथे सुरू असल्याने पोलीस प्रशासन व नगरपालिकेकडून तातडीने योग्य कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper