अत्यावश्यक सेवांसाठी नियम शिथिल
अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार रायगड जिल्ह्याच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, रायगड पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी संयुक्तरीत्या रायगड जिल्ह्यातील सर्व सीमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा. रायगड जिल्ह्यात आंतरजिल्हा बस आणि प्रवासी वाहतूक सेवा (खासगी वाहनांसह) त्यामध्ये खासगी चालकांकडून केली जाणारी वाहतूक सेवा, जलवाहतूक आदी वाहतुकीसही हे बंदी आदेश लागू आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू तसेच विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10नुसार प्राप्त अधिकारातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी रात्री 9 पासून पुढील आदेश होईपर्यंत रायगड जिल्ह्यात वाहतूक बंदी लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शासकीय-निमशासकीय कार्यालये, सहकारी महामंडळाचे उपक्रम-आस्थापना, बँका व रुग्णालये, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने, सर्व प्रकारचे वैद्यकीय कॉलेज व नर्सिंग कॉलेज, पेट्रोलपंप, एलपीजी गॅस एजन्सी, अंत्यविधी अत्यावश्यक किराणा सामान, दूध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय व त्यांचे होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, जीवनावश्यक वस्तू विक्री, वितरित करण्यास, घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी राहील. प्रसारमाध्यमांची (सर्व प्रकारची दैनिके, नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनेल इत्यादी) कार्यालये व त्यांची वाहने चालू राहतील.