महाड : प्रतिनिधी
रानात जाऊन एरंडाची फळे खाल्ल्याने महाड तालुक्यातील दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा झाली. या मुलांवर तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी देण्यात आल्याने महाडमधील दासगाव आदिवासी वाडीतील मुले शनिवारी (दि. 28) संध्याकाळी 3 वाजण्याच्या सुमारास शेजारील जंगलात फिरण्यास गेली होती. या वेळी त्यांनी एरंड फळांची बोंडे खाल्ली. यामुळे या मुलांना चक्कर येणे, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला. परिणामी भयभीत झालेल्या पालकांनी मुलांना प्रथम खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. त्यानंतर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
विषबाधा झालेल्या मुलांमध्ये गणेश यशवंत जाधव (वय 8), अमोल सीताराम हिलम (12), प्रेम लहू हिलम (7), ज्ञानेश्वर दिलीप जाधव (8), पार्वती दिनेश जाधव (12), शिरीष अंकुश जाधव (12), वैदेही काळू हिलम (5), अमित हरेश पवार (5), गणगी काळू हिलम (12), निर्मला राजा पवार (8), सोनू नितीन हिलम (10), चांदणी सुनील हिलम (10), प्रियांका लहू हिलम (12), सखाराम अंकुश जाधव (12) यांचा समावेश आहे.
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आफ्रिन खतीब यांच्यासह आरोग्यसेवक दीपक हाटे, आरोग्य सहाय्यक एम. एम. मेहता, परिचारिका एन. के. गडवले, एस. एस. जोशी, शिपाई आर. आर. पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे या मुलांची प्रकृती स्थिर आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper