Breaking News

औषधे घ्यावीत नेटकी…

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे व आजारांमधील प्रक्रिया आणि औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही आजमितीला योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात आणि त्याचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसतो. रुग्णाला एवढी औषधे देण्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्न डॉक्टरांनी स्वत:ला विचारला तर अनेक वृद्धांची काही औषधे कमी होऊ शकतात.

अनेक औषधे घ्यायची असल्याने काही वेळा नेमकी कोणती औषधे केव्हा, किती प्रमाणात घ्यायची त्याबाबत गोंधळ होतो. काही वेळा रुग्ण घेत असलेल्या इतर औषधांविषयी माहिती नसल्याने डॉक्टरांकडून औषधे लिहिताना त्रुटी राहू शकतात. दोन वेगवेगळे डॉक्टर वेगळ्या कंपनीचे मात्र एकाच प्रकारचे औषध लिहून देऊ शकतात आणि त्यामुळे रुग्णाला अधिक औषधे घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे औषधा-औषधांमधील परिणामही महत्त्वाचा असतो. काही वेळा दुसरे औषधे आधीच्या औषधांच्या उपचारांवर परिणाम करते. उदा. कॅल्शियम आणि लोहाच्या गोळ्या एकत्र दिल्या जात नाहीत. औषधांचा इतर आजारांवरही परिणाम होतो. उदा. वेदनाशामक गोळ्या घेतल्याने रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता घटते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना ही औषधे दिली जात नाहीत.

बहुऔषधे पद्धती म्हणजे काय?

एकाच वेळी पाचपेक्षा अधिक औषधे घेण्याच्या पद्धतीला बहुऔषधे पद्धती (पॉलीफार्मसी) म्हटले जाते. दहापेक्षा अधिक औषधे घेणे हे जास्त जोखमीचे असते. वेगवेगळ्या आजारांवरची औषधे घेणार्‍या रुग्णांमध्ये हे सर्रास आढळते. स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांची ठिसूळता असे आजार त्याचप्रमाणे वेदना, झोप कमी होणे, दीर्घकाळ चालणारे उपचार, वयासोबत दिसणारी लक्षणे अशा अनेक कारणांमुळे औषधांची संख्या वाढते आणि त्यामुळे 40 टक्क्यांहून जास्त वृद्धांमध्ये अनेक औषधे देण्याची वेळ येते. बहुऔषधे अनेकदा गरजेची असतात, मात्र त्यांचा वापर नीट केला नाही तर उपयोगितेपेक्षा ती दुरुपयोगी ठरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांना दिलेली औषधे आणि त्याचे परिणाम यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते.

बहुऔषधांमुळे औषधांचे दुष्परिणाम, औषधाला प्रतिरोध आणि जास्त खर्च असे अनेक परिणाम होतात. त्याचप्रमाणे मानसिक गोंधळ, स्मरणशक्तीवर तात्पुरता परिणाम व त्यातून रुग्णाच्या हालचालीवरही बंधने येतात.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply