पनवेल : प्रतिनिधी
राज्यात जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने अनेक पालकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे, मात्र याबाबत अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली असून, एवढ्यात शाळा नकोच, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही लग्नकार्य, सामाजिक आणि धार्मिक समारंभावर बंदी आणता. मग शाळेत एवढी मुले एकत्र आल्यावर त्यांनी संसर्ग होणार नाही का? त्यामुळे शाळा सुरू करणे हे धोकादायक आहे.
-योगेश ओतारी
लहान मुलांना लगेच संसर्ग होतो याची जाणीव असतानाही राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा खेळ करीत आहे. शाळेत मुलांना असलेला संसर्गाचा धोका स्वीकारण्यास माझी तयारी नाही. वेळ पडल्यास मी मुलांना ड्रॉप घेईन.
-मिलिंद मलबारी
मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. कोणत्याही संसर्गजन्य रोगाला लहान मुलेच लवकर बळी पडतात. स्कूल बसमध्ये लहान मुले अंतर ठेवून बसणे शक्य नाही. त्यामुळे शाळा सुरू करणे धोकादायक आहे.
-रूपाली अभंग, परिचारिका
लहान मुले सोशल डिस्टन्सिंगचे किती पालन करतील? दुसरीकडे शिक्षक वर्गात मुलांना शिकवतील की शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते की नाही याकडे लक्ष देतील?
हे सर्व पाहाता शाळा सुरू करू नयेत.
-राजेश्री भुजबळ
शाळा आता लगेच सुरू करणे योग्य नाही. मुलांबाबत रिस्क घेण्यापेक्षा संसर्ग कमी होईपर्यंत शांत राहणेच योग्य होईल. सेमिस्टरचे सरासरी मार्क देता येतील.
-विजया कदम
राज्य सरकारला विधानसभेचे अधिवेशन घेताना आमदारांना संसर्ग होईल अशी भीती वाटली म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. आमदारांची काळजी घेणार्या शासनाला लहान मुलांची काळजी वाटत नाही, असे दिसते. शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा आहे.
-अॅड. मनोज भुजबळ
RamPrahar – The Panvel Daily Paper