Breaking News

वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तहसीलदारांकडे मागणी

मुरूड ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात अनेक दिवसांपासून वीज गायब आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत येणार याबाबत कोणतीच शाश्वती नाही. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानाही वीज मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन केले जात नाही. अशा वेळी जनतेने न्याय कोणाकडे मागावा, अशी कैफियत मुरूड तहसीलदारांकडे मांडण्यात आली असून तालुक्यात लवकरात लवकर वीज आणावी, अशी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड तहसीलदारांची भेट घेण्यात आली.

या वेळी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी, माजी तहसीलदार नयन कर्णिक, विहूर ग्रामपंचायत माजी सरपंच मुश्रत उलडे, प्यारा किल्लेदार, नैनिता कर्णिक आदींसह अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. तहसीलदार गमन गावित एका कार्यक्रमासाठी गेल्यामुळे शिष्टमंडळाने महसूल नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांची भेट घेतली. या वेळी जैन यांनी सांगितले की, मुरूड वीज मंडळ 700पेक्षा जास्त पोल पडल्याचे सांगत आहे, परंतु प्रत्यक्षात 75 पोल बसवून झाले आहेत. जास्त पोल पडलेले असताना मनुष्यबळ कमी असल्याने हे काम वेळेत पूर्ण होणे शक्य दिसत नाही. तालुका दंडाधिकार्‍यांना विशेष अधिकार असून लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी उपकार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासोबत सभा आयोजित करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार गोविंद कौतुम्बे यांनी आपल्या समस्येचे लवकरात लवकर निरसन होण्यासाठी तहसीलदारांना सांगून लवकरच सभा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply