मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील कराडे खुर्द ग्रामपंचायत परिसरात येणार्या रसायनी हॉटेल (उज्वल हॉटेल) भोवतालच्या परिसराला पावसाच्या पाण्याने वेढले असून परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. यात रसायनी हॉटेल चार फुट पाण्यात गेल्याने हॉटेलातील फर्निचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
हॉटेलजवळच विजवितरणाचा ट्रान्सफार्म असलेले पोल पाण्यात बुडाल्याने शिवाय चार ते पाच फुट पाणी साचल्याने ट्रान्सफार्म पाण्याच्या संपर्कात येवून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही समस्या सुटावी यासाठी हॉटेल मॅनेजर विशाखा चितले यांनी कराडे खुर्द ग्रामपंचायत, बिडीओ, जिल्हाधिकारी, एमआयडीसी आदींना मे 2020 रोजी पत्रव्यवहार केला होता. परंतु सदर प्रश्न मार्गी न लागल्याने पावसाचे पाणी हॉटेललगतच्या परीसरात साचून तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
रसायनी हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने हॉटेलचा तलमजला पाण्यात बुडाला आहे. यामुळे हॉटेलातील लाकडी टेबल, खुर्ची, किचन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या लॉजिंग हॉटेलातील खोल्याही रिकाम्या झाल्या आहेत.कोरोना पार्श्वभूमीवर बसलेला फटका आणि पुन्हा नुकसान यामुळे आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रसायनी हॉटेल परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची पातळी आहे तशीच राहून सध्या तीन ते चार फुट पाणी आहे. या व्यावसायिकाला हॉटेल बंद करण्याची पाली आली आहे. तरी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी विशाखा चितले व प्रकाश यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper