यूएईत 19 सप्टेंबरपासून रंगणार तेरावा हंगाम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहे. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून, 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली.
स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचे समजते. 51 दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य असल्याचे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.
याआधी 26 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता, परंतु युएईवरून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौर्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौर्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांप्रमाणे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरू करण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे कळते. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे 20 ऑगस्ट रोजी संघ यूएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान चार आठवडे मिळणार आहेत.