Breaking News

…तर देश कोरोनाविरुद्ध जिंकेल!

पंतप्रधान मोदींचा विश्वास; मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली ही राज्ये आहेत. या राज्यांनी कोरोनाला हरवले तर देश जिंकू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. देशात सहा लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण याच 10 राज्यांत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण समीक्षेसाठी बसलो आहोत. या चर्चेतून आपल्याला एकमेकांच्या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळाले. एक नक्की की जर आपण सोबत येऊन या 10 राज्यांतून कोरोनाला हरवले तर देश जिंकेल.
पंतप्रधान मोदींनी बोलताना पुढे सांगितले की, कोविड-19 रुग्णांची 72 तासांत ओळख पटवणे तसेच जास्तीत जास्त चाचण्या करूनच आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. चाचण्यांची संख्या दिवसाला सात लाखांवर पोहचली आहे. यामुळे संक्रमण ओळखणे आणि ते रोखण्यासाठी मदत मिळतेय, त्याचे परिणाम आपण आज पाहतच आहोत. आपल्याकडे मृत्यूदर हा जगातील इतर देशांपेक्षा कमी होता आणि दिलासादायक म्हणजे हा दर आणखी घसरताना दिसतोय. अ‍ॅक्टिव्ह केस कमी होऊन रिकव्हरी रेट वाढताना दिसतोय. लोकांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे.
मृत्यूदर आणखी एक टक्क्याने का होईना पण खाली आणायचा आहे. आपण प्रयत्न केले तर तेही सहज साध्य करता येणे शक्य आहे. कसे करायचे, कसे पुढे जायचे याबद्दल आता बरीच स्पष्टता आलेली आहे. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि तेलंगणामध्ये चाचण्यांच्या संख्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्ध कन्टेन्मेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्व्हिलान्स हीच प्रभावी हत्यारे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply