Breaking News

गुरे पळवून कत्तल करणारी टोळी गजाआड

आरोपी मुंब्रा, भिवंडी, कल्याण भागातील

अलिबाग : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून रायगड जिल्ह्यात येऊन गुरे पळवून त्यांची कत्तल करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व मासांची तस्करी करण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा लवकरात लवकर उलगडा करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या.
या अनुषंगाने रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदीप पोमण, उपनिरीक्षक महेश कदम आणि सहकारी कर्मचारी यांचे खास पथक तयार केले. तसेच गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती संकलित करून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले.
पेण आणि खोपोली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांप्रकरणी आसिफ सादिक कुरेशी (रा. जुबली पार्क, कौसा-मुंब्रा, जि. ठाणे) व साकिब सहिद मनीयार (रा. पत्री पूल, कल्याण, जि. ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. पाली पोलीस ठाणे हद्दीतील चोरीप्रकरणी सुरज खलीराम कायरीया (रा. कोन गाव, ता.कल्याण) याला जेरबंद करण्यात आले आहे. पोयनाड, रेवदंडा, वडखळ, कर्जत, रसायनी, रोहा येथील पोलीस ठाण्यांत दाखल विविध आठ गुन्ह्यांप्रकरणी इंतजार अली मुद्दी शेख (वय 32, रा. कौसा-मुंब्रा जि. ठाणे) याला गजाआड करण्यात आले आहे. अटक केलेल्या चारही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेसुद्धा हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.
..असा साधला जातो डाव
गुरे चोर सायंकाळी मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून त्यांच्या वाहनाद्वारे पनवेलमार्गे रायगड जिल्ह्यातील प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी वाडी-वस्तीवर तसेच रस्त्यांवर फिरणार्‍या गाय-बैल या जनावरांना गुंगीचे औषध ब्रेडला लावून खाण्यास देतात. कधी कधी गुंगीचे इंजेक्शन देतात. सुमारे 15 मिनिटांत जनावर बेशुद्ध झाल्यानंतर त्यास बांधून वाहनात भरतात किंवा निर्जन स्थळी आल्यानंतर त्यांच्याजवळील हत्याराने जनावरांची कत्तल करून मुंडके, कातडे, कोथळा तेथेच टाकून मांस वाहनांत भरून निघून जातात. त्यानंतर चोरी केलेले जनावर मार्केटमध्ये विकतात तसेच मांसाची मार्केटमध्ये विक्री करतात, असे निष्पन्न झाले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply