मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (दि. 15) विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी मान्य करणार नाही. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणतीही स्थगिती आली नाही, पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यांना नोकर्या मिळाल्या आहेत, त्या मराठा तरुणांवर राज्य सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारनेच कोर्टात आम्ही भरती करणार नसल्याचे सांगितले. आ बैल मुझे मार याप्रकारे कोर्टाने विचारलेले नसतानाही राज्य सरकारने सांगून टाकले. त्यामुळेच प्रक्रिया पूर्ण झालेले मराठा तरुण आज आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. आमच्या काळात मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, मोर्चे झाले, पण कधीही कोणाला अटक झाली नाही. कोणाला मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका असे झाले नाही. आज तर एका प्रकारे आणीबाणी लागली आहे. मराठा समन्वयकांना अटक होते, मुंबईत येऊ नका, असे आदेश काढले आहेत. ते आपले नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, पण आंदोलन करायचेच नाही या भूमिकेमुळे संताप निर्माण होतोय, अशी टीका फडणवीसांनी केली. धनगर समाजासंदर्भात आम्ही केलेल्या सर्व योजना बंद आहेत. सरकारच्या मनात नेमके काय आहे हेच आम्हाला समजत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या घटकांच्या मनात सरकार संदिग्धता निर्माण करीत असून ती दूर झाली पाहिजे, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले. विजय वडेट्टीवार ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातेच मी निर्माण केले, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल
मुंबई : आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. या वेळी फडणवीस म्हणाले की, आज विधानसभेत मी मराठा आरक्षणाचा विषय मांडला, तर विधान परिषदेत प्रवीण दरेकरांनी हा विषय मांडला. आम्ही सरकारला सांगितले आहे की, याची केवळ आणि केवळ जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्हालाच इथून मार्ग काढावा लागेल. सरकारने मनात आणले तर काहीना काही मार्ग नक्की काढू शकते, मात्र दुर्दैवाने सरकारच्या वतीने टोलवाटोलवीशिवाय दुसरे काहीही होताना दिसत नाही. सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही. टोकाचा संघर्ष करावा लागला तरी तो करू.