Breaking News

‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी साधला देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करीत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणार्‍या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचे तसेच देशवासीयांना नववर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
 वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला अनेक नागरिकांनी पत्रे पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजूट दाखवली हेसुद्धा अनेकांनी लक्षात ठेवले, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करीत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले, व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचे आहे. प्रत्येक जण नव्या वर्षात काही संकल्प करतो. या वेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणार्‍या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply