सिडनी : वृत्तसंस्था
सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 338 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. त्यामुळे तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने तिसर्या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडले. त्यानंतर संयमी पण आक्रमकपणे फलकावर 103 धावा उभा केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रूपाने ऑस्ट्रलियाला दोन झटके बसले, मात्र तिसर्या दिवसाखेर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भारताला आणखी विकेट दिली नाही. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47, तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी, तिसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (50) आणि शुबमन गिल (50) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (26), अजिंक्य रहाणे (22) आणि रिषभ पंत (36) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने नाबाद 28 धावांची खेळी केली.
तीन फलंदाज धावबाद
भारतीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसर्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने अफलातून क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. ‘कांगारूं’नी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केले. यामध्ये हनुमा विहारी (4), आर. अश्विन (10) आणि जसप्रीत बुमराह (00) यांचा समावेश आहे.
पंत, जडेजा दुखापतग्रस्त
पहिल्या डावात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे. दुसर्या डावात त्यांच्या जागी अनुक्रमे मयांक अगरवाल व वृद्धीमान साहा क्षेत्ररक्षणासाठी आले. याआधी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, केएल राहुल, उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.