कृषी कायदे शेतकर्यांच्या फायद्याचे ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या वेळी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे शेतकर्यांच्या फायद्याचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नाराजीही व्यक्त केली.
आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. सरकारने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारला शाबासकी दिली.
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले. सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा 10 कोटींपेक्षा जास्त छोट्या शेतकर्यांना तत्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकर्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असे राष्ट्रपती म्हणाले.
सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचे पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकर्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते, मात्र काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, त्या संविधानातील कायदे आणि नियमांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था अस्तित्वात होती, जे अधिकार व सुविधा होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही. उलट या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकर्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करीत आहे, असेही राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केले आहे.