खालापूर : प्रतिनिधी
राज्यात 32व्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून त्या अनुषंगाने बोरघाट पोलीस केंद्र आणि पार्ले बिस्किट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरून वाहतूक करणार्या वाहनचालकांना वाहने थांबवुन वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात असलेल्या पोलीस केंद्रासमोर हे अभियान राबविण्यात आले असून या वेळी बोरघाट पोलिसांसमवेत यमराज रस्त्यावर उतरलेले होते. त्यांनी वाहतूकीचे नियम सांगून वाहनचालकांमध्ये जागृती केली. अतिवेगाने वाहन चालवू नये, दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवू नये, रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहन पार्किंग करू नये, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना समोर पाहणार्या प्रवाशी व चालक यांनी सीटबेल्डचा वापर करावा, थकलेले असाल किंवा झोप येत असेल तर वाहन चालवू नये, वाहन चालवताना सतर्क राहून समोरील रस्त्यावर लक्ष ठेवून वाहन चालवावे, वाहन चालवताना धोकादायकरित्या ओव्हरटेक करू नये, अपघातग्रस्त जखमींना जलदरित्या औषध व उपचार मिळण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, रुग्णवाहिकांना अडथळा करू नये, आदि वाहतूक नियमांचे महत्त्व या वेळी पटवून देण्यात आले. बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी, पार्ले कंपनीचे किशोर शेळके, हवालदार शिंदे, गावंड, जाधव, पाटील, ठाकूर, चव्हाण आदीसह अनेक वाहनचालक या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper