उरण : वार्ताहर,
मोहोपाडा : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी लाल तिखट मसाला घरी करून ठेवण्याची परंपरा असल्याने गृहिणींनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या मसाल्यासाठी लागणारी सामुग्री खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. दिवसेंदिवस लाल मिरची व गरम मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचा आर्थिक मेल साधताना चांगलाच गोंधळ उडत आहे. बाजारात उपलब्ध असणारा लाल तिखट मसाला खरेदी करण्यापेक्षा घरगुती (घरी) बनविलेला लाल तिखट मसाला अन्नपदार्थात वापरणे महिला पसंत करतात. मसाला करण्यासाठी पहाटेपासूनच मसाला कांडप मशिनच्या दुकानाबाहेर गर्दी होत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिरच्यांचे भाव किलोमागे 200 ते 300 रुपयांपर्यंत झाली आहे. यामध्ये बेडगी मिरची 200 ते 300 रुपये किलो, काश्मिरी 350 ते 400 रुपये किलो, शंकेश्वरी 250 ते 350 रुपये किलो, घंटूर 160 रुपये किलो, लवंगी 200 ते 240 रुपये किलो त्याचप्रमाणे सेलम हळद 180 ते 240 रुपये किलो, राजापुरी हळद 160 ते 180 रुपये किलो, निजाम हळद 150 रुपये किलो असे मिरचीचे दर आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक किलो मागे 100 रुपयाने वाढ झाली आहे, असे उरण येथील यशवंत जनरल किराणा स्टोअर्सचे किशोर यशवंत गायकवाड यांनी सांगितले.
बाजारात मिळणारा तयार लाल तिखट मसाल्यापेक्षा घरी बनविलेल्या मसाल्याला चांगली चव असते. बाजारातून आपल्यांना पाहिजे त्या दराची, चांगल्या प्रतीची लाल मसाल्याची मिरची खरेदी करून चांगली साफ केली जाते. चव येण्यासाठी मसाल्यामध्ये गरम मसाला सामुग्री टाकली जाते. त्यामुळे आम्ही दरवर्षी घरगुती मसाला बनविणे पसंत करतो.
-चित्रा गणेश म्हात्रे, नवे पोपुड, उरण
RamPrahar – The Panvel Daily Paper