शेअर बाजार पडला की नव्या गुंतवणूकदारांना धक्का बसतो. अशा गुंतवणूकदारांनी शक्यतो म्युच्युअल फंडाच्या मार्गानेच बाजारात प्रवेश केला पाहिजे, पण शेअर बाजाराचा आणि म्युच्युअल फंडांचाही थेट संबंध असल्याने त्या गुंतवणुकीतील जोखीम कशी कमी करावी, याविषयी अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे…
गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने जसा झटका दिला, तसा तो फेब्रुवारीमध्येही दिला होता. ‘शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण बाजार तापला की तो खाली येणे क्रमप्राप्त असते. अशा वेळी त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढते. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे,’ असे त्या वेळी म्हटले होते. नव्या गुंतवणूकदारांना त्याची प्रचिती आलीच असेल. अर्थात म्युच्युअल फंडात ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांनाही अनेक प्रश्न पडतात. विशेषतः त्यात पैसा कधी टाकावा आणि कधी काढून घ्यावा हे लक्षात येत नाही त्यांच्यासाठी ही प्रश्नोत्तरे.
प्रश्न – गुंतवणुकीत विविधता का ठेवली पाहिजे?
-तुमच्या गुंतवणुकीत इक्विटीमधील गुंतवणूक किती आहे हे तपासा. संपत्ती निर्माण करण्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे गुंतवणुकीतील शिस्तबद्ध विविधता. जर तुम्ही ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी फंडात झाली असेल तरच बाहेर पडण्याचा विचार करा. विशेषतः बाजार वर असतानाच बाहेर पडण्याची वेळ असते, पण तो वर आहे हे आपल्याला समजेलच असे नाही, परंतु इक्विटीतील गुंतवणूक आधीच खूप कमी असेल तर बाहेर पडणे हुशारीचे ठरणारे नसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की इक्विटी फंडात किती गुंतवणूक असावी? यासाठी नेमका आकडा किंवा टक्केवारी सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या जोखीम पचवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असते. आर्थिक नियोजनकार म्हणतात की, शेअर बाजारात मोठी हालचाल झाल्यानंतर किंवा वर्षातून एकदा आपल्या पोर्टफोलिओचे संतुलन तपासून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास पुनर्संतुलन साधावे. तुम्ही हे स्वतः करू शकत नसाल तर डायनॅमिक फंडाची निवड करा. आता लवकरच नवे आर्थिक वर्ष सुरू होईल. पोर्टफोलिओचे संतुलन करण्याची हीच वेळ आहे.
प्रश्न – पैशांची गरज भासणार असल्यास काय दक्षता घ्यावी?
-तुमचे उद्दिष्ट आणि त्यासाठी असणारा कालावधी लक्षात घेऊन गुंतवणुकीत विविधता ठेवावी. जर उद्दिष्ट पाच ते सात वर्षे लांब असेल, तर इक्विटी फंडाकडे झुकण्यास हरकत नाही, मात्र त्या फंडाची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता तपासून घेतली पाहिजे. मग मध्येच करेक्शन आली म्हणून तुम्हाला काळजी वाटणार नाही. अशा चढ-उताराच्या चक्रातून व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी एकदाच रक्कम टाकण्याऐवजी एसआयपीचा म्हणजे दर महिन्याला विशिष्ट रक्कम टाकण्याचा मार्ग योग्य ठरतो.
प्रश्न – उद्दिष्ट खूप जवळ म्हणजे दोन-तीन वर्षांचे असेल तर काय करावे?
-अशा स्थितीत इक्विटी फंडातील गुंतवणूक जोखमीची ठरू शकते. जर दोन वर्षांत फारशी संपत्ती निर्मिती झाली नाही आणि तुम्ही पैसे काढण्याच्या वेळीच बाजारात घसरण झाली, तर तुमच्या हातात अपेक्षित रक्कम पडणार नाही. हे टाळण्यासाठी गुंतवणूकदाराने उद्दिष्ट जवळ येईल तसतशी इक्विटी फंडातील गुंतवणूक कमी करत जावे.
प्रश्न – आपण जे फंड निवडले आहेत, त्या फंडाची कामगिरी कशी पाहावी?
-फंडाची कामगिरी निराशाजनक असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचे ते एक कारण ठरू शकते, पण जेव्हा सगळ्याच बाजारात (सर्व क्षेत्रांत) घसरण झालेली असते तेव्हा कुठलाही फंड त्या घसरणीतून सुटत नाही. त्यामुळे तुमच्या फंडाच्या वर्गातील अन्य फंडांची कामगिरी कशी आहे याचा अभ्यास करा. ही तुलना तत्कालिक नसावी. तुलना ही किमान दोन ते तीन वर्षांतील कामगिरीची असावी. जेणेकरून बाजारातील चढउताराच्या चक्राचा त्यात समावेश असेल. बेंचमार्क इंडेक्स किंवा बरोबरीच्या फंडांच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत तुमचा फंड कामगिरीबाबत मागे पडलेला असेल, तर बाहेर पडून नव्या फंडात गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो. जर थोडा अधिक काळ फंड कामगिरीबाबत मागे पडला असला तरी बाहेर पडण्याचा विचार करणे योग्य ठरत नाही.
प्रश्न – आपले उद्दिष्ट बदलले तर काय करावे?
परिस्थितीत मोठे बदल घडून आले, तर उद्दिष्टाचा कालावधी किंवा उद्दिष्टातील अपेक्षित परतावा बदलू शकतो. एखाद्याने पाच ते सात वर्षांनंतर मोठे घर खरेदी करण्याचे नियोजन केले असेल आणि काही दिवसांत अपत्य झाले किंवा वयोवृद्ध आईवडील राहण्यासाठी आले तर तातडीने मोठ्या घराची गरज भासू शकते. अशा वेळी गुंतवणुकीची व्यूहरचना बदलावी लागते आणि गुंतवणुकीच्या विविधततेही मोठे बदल होऊ शकतात. आता उद्दिष्ट अगदी काही महिन्यांवर असल्याने तुम्हाला इक्विटी फंडातून बाहेर पडावे लागणार असते. जर तुम्ही दोन-तीन वर्षांतच घर खरेदी करायचे ठरवले असेल तर डेट फंड हा सगळ्यात चांगला पर्याय ठरतो.
प्रश्न – अनेक फंडांत गुंतवणूक गरजेची आहे का?
-फंडातून बाहेर पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली अनेक योजनांमध्ये गुंतवणूक असणे. तुम्ही तुमच्या खात्यात अनेक योजना समाविष्ट करत राहिलात, तर अनेक वेळा द्विरुक्ती होण्याची शक्यता असते. जास्तीत जास्त पाच ते सहा योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये गुंतवणूक फारशी प्रभावी ठरत नाही. पुन्हा जितक्या जास्त योजना तितकी त्यांच्यावर देखरेख ठेवणे कठीण होते. शिवाय फंड कंपनी व्यवस्थापन खर्च घेत असते. तोही वाढतो.
प्रश्न – अधिक जोखीम घ्यायची नसल्यास काय करावे?
-शेअर बाजार गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे कोसळला होता. तेथून तो तब्बल 90 टक्के वधारला आहे, पण बाजार असा एका दिशेने जाऊच शकत नाही याची प्रचिती आलीच आहे. आपल्या गुंतवणुकीला चांगला परतावा मिळत आहे हे पाहून परकीय तसेच देशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेअर बाजारात आता सतत चढउतार होत राहील. शेअर बाजार वधारल्यामुळे अर्थातच इक्विटी म्युच्युअल फंडांचे एनएव्ही वाढले आहेत. त्यामुळे अशा म्युच्युअल फंडांत दिसत असलेला नफा जमा करून घेऊ, असे गुंतवणूकदारांना वाटणारच आहे. अशा वेळी ज्यांना म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची त्याने नेमके काय करावे, असा प्रश्न आहे. अशांनी डेट, इक्विटी आणि सोने अशा तिन्हीत गुंतवणूक करणार्या बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करावी, हे त्याचे उत्तर आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार इक्विटीचा वाटा हे फंड कमी अधिक करत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित राहतात. या प्रकारच्या म्युच्युअल फंडांनी गेल्या वर्षी 14 ते 25 टक्के परतावा दिला आहे. हा परतावा इक्विटी फंडांपेक्षा कमी असला तरी त्यात इक्विटी फंडांत असते तेवढी जोखीम नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.
प्रश्न – फंडांची निवड करण्याचा काही सोपा मार्ग आहे का?
-अनेक आर्थिक संस्था सध्या फंडांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांची क्रमवारी लावत आहेत. अशा संस्थांनी म्युच्यअल फंडांचे रँकिंग लावले असून त्यावर काही प्रमाणात आपण विसंबून राहू शकतो. अशी अॅपही सध्या उपलब्ध आहेत. त्यावर ऑनलाइन केवायसी करून तुम्ही कोठेही न जाता थेट गुंतवणूक सुरू करू शकता.
-यमाजी मालकर