नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे भारतात आयोजन करण्यात कोणतीही चूक नव्हती, परंतु प्रवासामुळेच जैव-सुरक्षा (बायो-बबल) परीघ भेदले गेले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे.
‘सहा जैव-सुरक्षित परिघांमधील केंद्रांवर आयपीएलच्या आयोजनाची योजना उत्तम होती. जैव-सुरक्षित वातावरणातही कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचे नेमके कारण मला माहीत नाही. याचा आढावा आम्ही निश्चितच घेऊ, परंतु प्रवासामुळेच कोरोनाने जैव-सुरक्षा कवच भेदले असावे,’ असे मत गांगुलीने व्यक्त केले.
‘फेब्रुवारीत इंग्लंडने भारतात यशस्वी दौरा केला. आम्ही जेव्हा आयपीएल 2021चा निर्णय घेतला, तेव्हा देशातील करोनाची साथ नियंत्रणात होती. स्पर्धा सुरू झाली असतानाही देशात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित होती. मुंबईचा टप्पाही सुरळीत पार पडला,’ असे गांगुलीने सांगितले.
अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी चर्चा केली जात असून, लवकरच याबाबत ठोस भूमिका स्पष्ट होऊ शकेल अशी आशा आहे, असे गांगुलीने म्हणाला. ट्वेण्टी-20 विश्वचषकाबाबत आताच भाष्य करणे घाईचे ठरेल. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असेही त्याने स्पष्ट केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper