Breaking News

अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात आला नव्हता. आताच्या घडीला धरणाच्या पात्रात तब्बल 38 हजार 500 क्युबिक क्विंटल इतका गाळ साचला आहे. या गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. शिवाय येथील नागरिकांना चिखलयुक्त पाणीपुरवठा होत होता. मे अखेरपर्यंत पाणी पुरत नव्हते. याबाबतचे वृत्त (खबरबात) 14 मेरोजी दै. रामप्रहरमध्ये प्रसिध्द झाले होते. दोन वर्षांपुर्वी स्थानिक ग्रामस्थांनी एक दिवस श्रमदान करून धरणातील गाळ काढला आणि जिल्हा परिषदेला आपल्या नाराजीची आठवण करून दिली होती. मात्र परिस्थिती जैसे थे होती. मागील काही दिवसात स्थानिकांनी पुन्हा हा मुद्या उचलून धरला आणि गाळ न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर मागील आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत या धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाची मोठी मदत झाली आहे. जलसंपदा विभागाने यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. तर रायगड जिल्हा परिषदेने डिझेल व इतर खर्चासाठी 25 लाख रूपयांची तरतूद केली आहे. पुढील 15 दिवसात हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गाळ निघाला तर धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ होवून परिसरातील नागरिकांना मेअखेरपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. या कामाच्या शुभारंभाच्यावेळी जिल्हा परिषद, अलिबाग पंचायत समिती, पाणी पुरवठा व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply