Breaking News

रायगडात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा; दरडग्रस्त गावांमधील लोकांचे होणार स्थलांतर

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात दोन दिवस (दि. 10 व 11) अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील 62 गावे, खाडीकिनार्‍यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. मुबईसह उत्तर कोकणमध्ये 10 व 11 जून रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे भुस्खलन होण्याची भिती असते. भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 103 संभाव्य दरडग्रस्त गावे आहेत. त्यातील 20 गावांना भुस्खलनाचा तीव्र धोका असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. या 20 गावातील नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा निधी चौधरी यांनी दिले आहेत. म्हसळा तालुक्यातील वावा, आमशेत, महाड तालुक्यातील लोअर तुडील, टोळ खुर्द बौध्दवाडी, मोरेवाडी शिंगरकोंड, पातेरवाडी आंबिवली बुद्रुक, मुठावली, सोनघर, चांढवे खुर्द, रोहण, कोथेरी जंगमवाडी, खालापूर तालुक्यातील सुभाषनगर, कर्जत तालुक्यातील मुद्रे बुद्रुक, श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी माराठवाडी, कोतवाली खुर्द, रोहे तालुक्यातील तीसे आणि वाळुंजवाडी या गावांमधील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केले जाणार आहे. या शिवाय इतर संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांना तेथील परिस्थिती बघून गरज पडल्यास स्थलांतरीत केले जाणार आहे. पाऊस पडत असताना जर समुद्राला भरती आली तर किनार्‍यावरील गावांमधील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. अशा गावांतील लोकांनादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंत्रणेलादेखील सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाऊस पडत असताना जनतेने घरातच सुरक्षित रहावे. घर मोडकळीस आले असल्यास सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. वादळाच्या कालावधीमध्ये किमान तीन दिवस पुरेल इतका सुका मेवा,खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे ठेवावीत. समुद्र व नदीकिनारी राहणार्‍या लोकांनी सावधगिरी बाळगावी. मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक 02141-222097/227452) संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आपला जीव महत्वाचा आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना कुणीही घराबाहेर पडू नये. आवश्यक समान घरात ठेवावे. समुद्र, नदी किंवा तलावांमध्ये पोहण्यास जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे कोटेकोर पालन करावे.

-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply