अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार होती. जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाऊस पडत असून पनवेल तालुक्यात सर्वाधिक 113.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर श्रीवर्धन तालुक्यात 103 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी पाऊस पडला आहे.
पुढील दोन दिवस (दि. 10 व 11) रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या 20 गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तसेच समुद्र व खाडीकिनार्यावरील गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) पनवेल 113.60, श्रीवर्धन 103, मुरूड 65, रोहा 64, अलिबाग 60, पेण 58, तळा 56, खालापूर, माणगाव, महाड व म्हसळा प्रत्येकी 53, सुधागड 48, पोलादपूर 43, कर्जत 41.80, उरण 40, माथेरान 39. एकूण पर्जन्यमान 943.80. सरासरी 58.99.
Check Also
सामाजिक कार्यकर्ते गुलशन पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचे काम करते …
RamPrahar – The Panvel Daily Paper