नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून नव्या इतिहासाची नोंद केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. मीराबाईच्या या कामगिरीनंतर अनेकांनी ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 1896च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे, पण 2000च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगचे पदकांचे द्वार खुले झाले. आंध्र प्रदेशमधील एका छोट्याशा गावातील कर्णम मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. या यशानंतर मणिपूरसारख्या गावातून आता मीराबाईच्या रूपात आशेची किरणे दिसू लागली आणि मीराबाईने सोनेरी कामिगिरी करीत देशाचे नाव उंचावले आहे. मीराबाई 2017मध्ये वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपची (48 किलो) विजेती ठरली. या वर्षी एप्रिलमध्ये तिने 86 किलो स्नॅच आणि विश्वविक्रमी 119 किलो वजन उचलून विजेतेपद जिंकले. तिने एकूण 205 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले. 2016ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धा चानूसाठी निराशाजनक होती, पण त्यानंतर तिने सतत आपला खेळ सुधारला. 2017मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2018मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.
RamPrahar – The Panvel Daily Paper