Breaking News

भारताचा स्वप्नभंग; पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था

अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा 5-2च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह 11 ऑलिम्पिक पदके खात्यावर असणार्‍या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोकियो ऑलिम्पिकमधील ही ड्रीम रन संपुष्टात आली. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते, मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसर्‍या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवले. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करीत 1-0ची आघाडी घेतली, मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करीत 2-0ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 2-1ची आघाडी कायम ठेवली. दुसर्‍या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना 2-2च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसर्‍या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले. बेल्जियमकडून अ‍ॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅट्ट्रिक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आले. तिसर्‍या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचे सोने करीत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने 5-2ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाचपैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळाले होते. 1980च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक ब्रिटनला 3-1 अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते, पण त्या वेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. 1972मधील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताने 0-2 अशी हार पत्करली होती. दुसर्‍या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा पराभव पत्करल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश केला होता, मात्र भारताचे स्वप्न भंगले आहे.

भारतासाठी हा दुःखाचा दिवस आहे,  कारण आम्ही हरलो, पण आमच्याकडे कांस्यपदकाचा सामना अजून शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी तयारी करू. आम्ही एक अतिशय महत्त्वाचा सामना गमावला, आम्ही काही मोठ्या चुका केल्या, पण कांस्यपदकाच्या लढतीत आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ. आमच्याकडे एक दिवस आणि एक सामना शिल्लक आहे, म्हणून आम्ही लढणार.

-मनदीप सिंग, भारतीय हॉकीपटू

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply