सरपंच रंजना पाटील यांची मागणी
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
सतत पडणार्या पावसामुळे पिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी, पर्यटक आणि वाहनचालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना चारुदत्त पाटील यांनी ओएनजीसी प्रकल्पाला दिलेल्या निवेदन पत्रकाव्दारे केली आहे.
उरण तालुक्यातील म्हातवली व नागाव ग्रामपंचायत हद्दीत केंद्र शासनाचा महत्त्वाचा ओएनजीसी प्रकल्प आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. अशा वाहनांच्या वर्दळीमुळे उरण चार फाटा येथून पिरवाडी चौपाटीकडे जाणार्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे फिरवाडी चौपाटी व गाव परिसरात ये-जा करणार्या पादचारी नागरीकांच्या अंगावर उडणार्या खड्ड्यांतील घाणीच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. तसेच पिरवाडी चौपाटीवर ये-जा करणार्या वाहन चालकांना रस्त्यातील खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
पुढील महिन्यात गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण येऊ घातला आहे. तरी ओएनजीसी प्रकल्पातील व्यवस्थापनाने उरण चार फाटा येथून फिरवाडी चौपाटीकडे जाणार्या रस्त्यांचे दुरुस्तीचे काम गणेशोत्सवापुर्वी हाती घ्यावे, असे सरपंच रंजना पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने ओएनजीसी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper