मुरूड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याची शासन दरबारी नोंद होऊन वर्ष उलटून गेले, तरी कुठलीही मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट असणार्या लोकांमध्ये नाराजी व संताप निर्माण झाला आहे.
मुरूड समुद्रकिनारी वडापाव, चायनिज, नारळ पाणी, स्नॅक्स सेंटर, भेळपुरी, पाणीपुरी व अन्य अशा सुमारे 44 टपर्या आहेत. जुलै महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात या टपर्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या केल्या. उपोषण केले. आत्मदहनाचा इशाराही दिला, परंतु शासनातर्फे या नुकसानग्रस्तांना काहीही मदत मिळाली नाही. काशीद समुद्रकिनारीसुद्धा 64 टपरीधारक असून शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नसल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper